मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...